जिल्हा कारागृहात ‘जीवन गाणे गातच जावे’ कार्यक्रमाचे आयोजन

नगर, ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि अप्पर पोलीस संचालक व पोलीस महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 25 मार्च रोजी अहिल्यानगर जिल्हा कारागृह (वर्ग-02) येथे एक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. “जीवन गाणे गातच जावे” या विषयावर झालेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट कारागृहातील बंदीजनांना मुख्य प्रवाहात आणणे, तसेच त्यांच्यात देशभक्ती, बंधुभाव आणि संस्कृतीचे संवर्धन करणे होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कारागृह अधीक्षक संतोष कवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या वेळी वरिष्ठ तुरुंग अधिकारी विजय साळुंके, डॉ. सुजाता सानप, कांती सोनमाळी (मिर्ज), हिराचंद ओंबासे (सुबेदार), गणेश बेरड, सुनील विधाते (हवालदार) आदी उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी कारागृहातील कर्मचारी आणि बंदीजणांनी देखील गाणी सादर करून कार्यक्रमाचा आनंद घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रा. आदेश चव्हाण, नितीन निंबाळकर, पुनम कदम यांनी मेरे देशप्रेमीयो, जहा डाल डाल पर, शिवाजी महाराज पोवाडा, कव्वाली, चित्रपट गीते, स्फुर्ती गीते, लावणी अशी एकापेक्षा एक गाणे सादर करून कार्यक्रमात चैतन्य निर्माण केले. त्यांना निलेश सोज्वळ, ऍडविन पेरेपाडम, सिद्धांत गायकवाड या वादकांनी उत्कृष्ट साथ दिली. तर रियाज पठाण यांनी आपल्या निवेदनातून कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्यांच्या सादरीकरणातून बंदीजनांमध्ये मनोरंजनासोबतच देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भक्तिभाव जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.


“जीवन गाणे गातच जावे” या कार्यक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील बंदीजनांना आत्मपरीक्षणाची संधी मिळावी, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सामील होण्याची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता.
अप्पर पोलीस महासंचालक,सुहास वारके, महानिरीक्षक व कारागृह सुधारसेवा महाराष्ट्र राज्य, पुणे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर, नाशिक विभाग, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कारागृहातील इतर कर्मचारी व बंदीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(सोबत कार्यक्रमाचे छायाचित्र संलग्न)