पुस्तकं सोडून हातात चाकू… आणि झाला एक खून- जबाबदार कोण?

नगर मधील सिताराम सारडा विद्यालयातील धक्कादायक घटना
नगर (प्रतिनिधी) शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर असतं… संस्कारांची शाळा असते… पण आज एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याचा चाकूने खून करतो, तेव्हा आपली शिक्षणसंस्था नव्हे तर आपला संपूर्ण समाज व्यवस्थाच कटघऱ्यात उभी राहते.
ही धक्कादायक घटना सीताराम सारडा विद्यालयात घडली. शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठीत शाळा… पण आज तिचं नाव जिथे घेतलं जातंय, तिथे विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या बातम्याही आहेत.

मयत विद्यार्थ्याचे नाव अफान मुस्तकीर शेख (वय – १५, इयत्ता १०वी). त्याचा खून करणारा मुलगा आठवीत शिकतो. शाळेच्या दुपारच्या सत्रात दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच क्षणात एका अल्पवयीन मुलाच्या बॅगेतून चाकू काढून दुसऱ्याच आयुष्य कायमचं संपवलं गेलं.
जखमी अफानला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही घटना ऐकून पालक सुन्न झाले. शाळेत गर्दी झाली, गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळाताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे (Topkhana Police) यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले असून परिसरात तणावपूर्व शांतता आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात (Police Station) सुरू आहे.
शिक्षण नाही, संस्कार हरवलेत का?
या दोघा मुलांच्या कुटुंबांमध्ये गेल्या काही काळात वाद होता. पोलिसांत तक्रारी होत्या. शेजारचा वाद आता थेट मुलांच्या मनात उतरला. आणि हेच संस्कारांचे अपयश नव्हे का? आज या अल्पवयीन मुलाच्या बॅगेत चाकू कसा पोहोचला?
कुणी दिला? कुणी शिकवलं?
शाळा, पालक, समाज… याला जबाबदार कोण ?
शाळेचा इतिहास, समाजाची स्मृती
या शाळेच्या इतिहासात आधीही एक काळा क्षण नोंदला गेला होता. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी, जे शाळेचे मुख्याध्यापक होते, त्यांनी शाळेजवळील गुटखा-तंबाखू विक्री थांबवण्यासाठी आवाज उठवला होता. त्यांच्या या सामाजिक भानाच्या कामामुळे त्यांच्यावरच हल्ला झाला होता. आणि आज… त्याच शाळेत विद्यार्थ्याच्या हातात एक ‘हत्यार’ दिसलं. पुन्हा एक वेगळा हिंसाचार… पुन्हा एक डाग.
ही घटना नव्हे, हा आरसा आहे
हा खून केवळ शाळेतला गुन्हा नाही,
हा आपल्या संस्कारशून्य होत चाललेल्या समाजाचा धगधगता आरसा आहे. जेव्हा मुलं मोबाईलमध्ये गेमपेक्षा हिंसा जास्त पाहतात, जेव्हा मोठ्यांचे वाद घराच्या भिंती पार करून मुलांच्या मनात भिनतात,
जेव्हा आपली शिक्षणपद्धती फक्त मार्कांवर थांबते, तेव्हा… अशा घटना अटळ ठरतात.
उठा… अजून वेळ गेलेली नाही!
या घटनेनंतर पोलिसांची कारवाई होईल, न्यायव्यवस्था पुढे जाईल… पण खरं उत्तर त्या मुलांच्या मनात शोधावं लागेल.
पालकांनी संवाद साधावा लागेल.
शाळांनी केवळ शिक्षण नव्हे तर संस्कारांचंही काम पुन्हा अंगीकारावं लागेल. आणि समाजाने… थोडं सजग व्हावं लागेल .कारण,
जेव्हा शाळेच्या बॅगेत पुस्तकाऐवजी चाकू सापडतो, तेव्हा शाळा नव्हे… पूर्ण समाज नापास होतो.