जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण देण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी) – पाथर्डी तालुक्यातील मौजे जवखेडे खालसा येथे दिनांक 25 व 26 जून रोजी पीर बाबा रमजान दर्गा उर्फ कान्होबा येथे काही विघ्नसंतोषी व्यक्ती बेकायदेशीरपणे एकत्र येऊन धार्मिक द्वेष पसरविण्याच्या उद्देशाने गैरकृत्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गावातील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जवखेडे खालसा येथील पीर बाबा रमजान दर्गाला संरक्षण देण्याची तसेच अशा व्यक्तींना रोखून शांतता राखण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुस्लिम समाजाकडून करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सदर दर्ग्यावर गेल्या दीडशे वर्षांपासून मुस्लिम समाज दिवाबत्तीची सेवा करीत असून, त्यासाठी शासनाकडून इनामी जमिनीही देण्यात आलेल्या आहेत. याबाबतचा उल्लेख शासकीय गॅझेटमध्ये असून, ॲलिनेशन रजिस्टरमध्येही त्याची नोंद आहे.
मात्र गेल्या तीन वर्षांपासून काही विघ्नसंतोषी लोक या ठिकाणी राजकारण करून जातीय तेढ निर्माण करत आहेत. दर्ग्यावर येऊन मुस्लिम समाजातील मुजावरांना धमकावणे, शिवीगाळ करणे, तसेच दर्ग्यावर जबरदस्तीने आरती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक गुरुवारी हा प्रकार घडत असून, मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुस्लिम समाजाने आरोप केला की, दर्ग्यावर असलेला हिरवा झेंडा काढून तेथे भगवी चादर टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा दर्गा मुस्लिम समाजासाठी धार्मिक श्रद्धास्थान असून, तेथे पूर्वी कधीही आरतीचा प्रकार झाला नाही. तरीही ठराविक गटाकडून समाजात तेढ निर्माण होईल अशा कृती केल्या जात आहेत.
19 जून रोजी दर्ग्याचे सेवक मुजावर यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर प्रशासनाने दोन्ही समाजांची बैठक घेतली असली तरी मुस्लिम समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
सदर प्रकारामुळे 25 व 26 जून रोजी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, त्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संबंधित विघ्नसंतोषी लोकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाने केली आहे.
या वेळी भैय्या शेख, शाहिद पठाण, परवेज अशरफी, फिरोज शेख, हुसेन शेख, शफिक शेख, शाकीर शेख, असिफ शेख, इरफान शेख, अन्वर शेख यांच्यासह गावातील अनेक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.